हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
पाचवा मैल ते सलगरे या मुख्य मार्गाचे काम रखडत का होईना सुरू आहे. कित्येक महिन्यानंतर हेरवाड बसस्थानक ते घोसरवाड फाटा येथील कामास सुरुवात झाली आहे. शिरोळ,अर्जुनवाड या गावामधून जाणारा मार्ग सिमेंट क्रॉंकीटचा होत आहे. पण सातत्याने महापुरात पाण्याखाली जाणारा बसस्थानक परिसरातील रस्ता डांबरी केला जात आहे. या रस्त्याची भविष्यात कोण जबाबदारी घेणार? पुन्हा खड्डे पडणार हे निश्चित आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला सांडपाण्याचा विसर्ग होण्यासाठी गटार असणे गरजेचे आहे. मात्र संबंधित कंत्राटदार गायकवाड गल्ली येथे गटार करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याचे काम व्यवस्थितरित्या होत नाही, तोपर्यंत या रत्स्याचे काम होवू देणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तानाजी गायकवाड यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, शिरोळ, अर्जुनवाड या ठिकाणी असणाऱ्या स्टॅन्ड चौकात मजबूत काँक्रिटीकरण करून दोन्ही बाजूला गटार करून हा रस्ता करण्यात आला आहे. मात्र शेवट टप्प्यात आलेला हेरवाड येथे सदर रस्त्याचे कायम घाईगडबडीत करण्यात येत आहे. गायकवाड गल्ली येथून एकता चौक इथपर्यंत पावसाळ्याच्या काळात ओढा वाहतो. मात्र संबंधित कंत्राटदाराने या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार न करता डायरेक्ट खडी टाकून रस्ता करत असल्याने रस्त्यावरील तसेच वरून येणारे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी गटार न केल्यास तसेच रस्त्याचे काम व्यवस्थितरित्या न केल्यास या रस्त्याचे काम बंद पाडण्याचे इशारा तानाजी गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
