रसायनयुक्त सांडपाण्यामुळे हजारो मासे मृत
तेरवाड / शिवार न्युज नेटवर्क :
अवकाळी झालेल्या पावसाचा फायदा घेत काही कारखानदार व उद्योजकांनी उद्योगधंद्याचे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदी पात्रात सोडल्याने प्रदुषित पाण्यामुळे मासे मृत्यूमुखी पडले असून तेरवाड बंधार्यावर मृत माशांचा खच पडला आहे. दुषित पाणी आणि मृत मासे यामुळे पाण्याला उग्र वास येत असून पंचगंगा नदीकाठच्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पंचगंगा नदीपात्रात इंचलकरंजी शहरातील सांडपाणी, उद्योजकांनी विना प्रक्रिया रसायनयुक्त सांडपाणी सोडत असल्याने पंचगंगा नदीपात्रात सोडत असल्याने नदी प्रदुषित होत असते उन्हाळ्यात याची तीव्रता अधिक जाणवते. नदी प्रदुषित करणार्या घटकांवर कारवाई करावी या मागणीसाठी वारंवार आंदोलन करत असतात त्यामुळे काही अंशी या घटकांवर आंदोलकांचा अप्रत्यक्ष अंकूश असतो.
अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. नदीपात्रात वाहते पाणी वाढत असल्याने काही उद्योजकांनी व कारखानदारांनी रसायनयुक्त सांडपाणी नदीपात्रात सोडल्याने प्रदुषित पाण्यामुळे नदीपात्रातील मासे मृत्यूमुखी पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर तेरवाड बंधार्याला तटल्याने तेरवाड बंधार्यावर मृत माशांचा खच पडला होता. याची दखल घेवून शुक्रवारी प्रदुषण नियंत्रण मंडळाने या घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच बंधाऱ्यातून पाणी प्रवाहित होत असल्यामुळे मृत मासे वाहून जात आहेत.
प्रदुषित पाण्यामुळे पाण्याला फेस येत असून मृत माशामुळे पाण्याला उग्र वास येत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रदुषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.