Top News

तलाठ्यांच्या मनमानी कारभारामुळे बोरगावातील शेतकरीवर्ग हैराण : नगरसेवक शरद जंगठे यांचा आरोप

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

         बोरगाव येथील ग्राम तलाठी हे शेतकऱ्याडून शासकीय कामासाठी मोठ्या रक्कमांची मागणी करत शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा घणाघाती आरोप नगरसेवक शरद जंगटे यांनी केला असून या विरोधात तलाठी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पुढाकाराने मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

     बोरगाव तलाठी हे शेतकऱ्यांचा सातबारा नावावर करणे,डायरी नोंद करणे,रहिवाशी प्रमाण पत्र देणे यासारख्या अन्य शासकीय कार्यालयीन कामासाठी सर्वसामान्य शेतकरी माणसांकडून मोठ्या रक्कमेची मागणी करत असतात. शिवाय पैसे न दिल्यास अथवा पैश्याची रक्कम कमी जास्त केल्यास शेतकरी नागरिकांना कार्यालयीन कामासाठी अनेक वेळा हेलपाटे मारण्यास भाग पाडून शेवटी पैसे घेतल्यावरच शासकीय काम करण्याचा नित्यनियम केला असल्याने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या उद्देशाने शहरवासीय नागरिकांनी ग्राम तलाठी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे या भ्रष्ट तलाठींची लवकरात लवकर बदली करण्याची मागणी नागरिकांनी धारेवर धरली आहे.

     बोरगाव हे सीमा भागातील शहर असल्याने या ठिकाणी महाराष्ट्रयीन लोकांनी भरपूर प्रमाणात शेतजमिनी खरेदी केल्या आहेत.त्यामुळे भाषेचा समन्वय साधण्यात होणारी अडचण आणि परप्रांतीय याकारणाने अनेक शेतकऱ्यांकडून अनेक शासकीय योजनेच्या नावाखाली तलाठी मोठ्या रक्कमा वसुली करणे नित्याचे ठेवले आहे. त्यामुळे या शहरातील काही तलाठी हे निलंबित तर काहींच्या बदल्या केल्या आहेत. याची चांगलीच कल्पना असतानाही हे तलाठी महोदय कामाच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक धुलाई करीत असल्याने त्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. त्यामुळेच एकजूट ग्रामस्थांनी या तलाठी कार्यालयावर लवकरच मोर्चा काढण्याचा निर्धार केला असून या निषेधार्थ शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तलाठी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या मोर्चात सहभाग दाखवण्याचे आव्हान नगर सेवक शरद जंगटे यांनी केलं आहे.

    शासनाच्या विविध योजना घरोघरी पोहचविण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून अनेक सुविधा पोहचविण्याचे कार्य सुरू आहे. मात्र बोरगाव मध्ये यासर्व सुविधा पोहचविण्यात बोरगाव तलाठी कार्यालय थेट नापास झाल्याने तसेच बाजूच्या सर्व गावात सुरू असणाऱ्या सुविधांची बाब बोरगावशी तुलना केल्यास बोरगांवकरात नाराजीला कारण ठरले आहे.त्यामुळे या संबधित अधिकाऱ्याची तातडीने चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे .

    यावेळी भुपाल महाजन,राजू कुंभार,दिपक वाघमोडे,शितल चौगुले,अश्विन गुंडे,अमर जनवाडे,महावीर पाटील,धवल भिवरे,सोनल यादव,शब्बीर मुजावर,पांडू मुसळे,अबू फरास, राहुल कुंभार,जहांगीर शेख,अजित कडोले,महेश वसवाडे,अमर हुदेड यांच्यासह अन्य मान्यवर,नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने